सहायक उपनिरीक्षक रंजन तेलंग यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक; बाल कल्याण समितीच्या प्रक्रियेनंतर बालकाची सुरक्षित सुटका
शेगाव – प्रतिनिधी
आईच्या रागामुळे घर सोडून अकोल्याहून शेगाव येथे आलेल्या १५ वर्षीय मुलाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सतर्कतेमुळे सुखरूप शोधून त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक रंजन तेलंग यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन यामुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
शून्यातून उभारला जागतिक उद्योगसमूह; शेगावच्या दांपत्याला ‘विदर्भ गौरव’ पुरस्काराचा मान
घटनेची माहिती अशी की, अकोला येथील १५ वर्षीय मुलगा आईच्या रागामुळे कोणालाही न सांगता घरातून निघून शेगाव रेल्वे स्थानकावर आला होता. स्थानक परिसरात मुलाच्या चेहऱ्यावरील घाबरलेले भाव आणि संशयास्पद हालचाली पाहून शेगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि तत्काळ रेल्वे सुरक्षा बलाला माहिती दिली.
माहिती मिळताच सहायक उपनिरीक्षक रंजन तेलंग यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मुलाला विश्वासात घेत विचारपूस केली. त्यावेळी मुलाने आईच्या रागामुळे घर सोडल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून आईशी संपर्क साधण्यात आला. मुलगा सुरक्षित असल्याचे समजताच त्याची आई अकोल्याहून तातडीने शेगाव येथे दाखल झाली.
</div>
अनेक तासांच्या चिंतेनंतर मुलाला सुखरूप पाहताच आईला आनंदाश्रू अनावर झाले. हा प्रसंग उपस्थितांनाही भावूक करून गेला.
यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने मुलाचे समुपदेशन केले. बाल कल्याण समितीच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.
या वेळी मुलाची आई भावूक होत रेल्वे सुरक्षा बलाचे तसेच सहायक उपनिरीक्षक रंजन तेलंग यांचे मनापासून आभार मानले. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा बलाची केवळ सुरक्षा यंत्रणा म्हणून नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्व जपणारी संवेदनशील संस्था म्हणूनही ओळख अधोरेखित झाली.


